शिक्षक आणि अशैक्षणिक कामकाज
शिक्षक आणि अशैक्षणिक कामकाज :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या अगतिकतेचे जळजळीत वास्तव आपण सर्वांनी वाचावे. समाजातील एक जबाबदार घटक म्हणून शैक्षणिक धोरण आणि शाळेतील शिक्षकांना दैनंदिन अध्यापनापासून वंचितच नव्हे तर बालकांपासून दूर ठेवणारी यंत्रणा.. या सर्व घटकांना जाब प्रत्येकाने विचारलाच पाहिजे.
स्वतःच्या नावापुढे शिक्षकीपणाचं लेबल लावलेल्या, नेमकं काय चाललयं या संभ्रमात असलेल्या प्रत्येक शिक्षकाला पडलेला हा भाबडा प्रश्न 'हू आय अँम ? कोण आहे मी ? आचारी, रंगारी, कारकुन, टपाल्या की अजून कुणी ? लेकरांकडे डोळेझाक करत सगळी शक्ती मोबाईलच्या स्क्रिनवर पणाला लावणारा टेक्नोसेव्ही योद्धा की आणखी कुणी? विद्यार्थी सोडून इतरत्र केंद्रीत झालेल्या कुचकामी शिक्षण पद्धतीच्या चक्रव्युहात अडकलेला अभिमन्यू म्हणजे शिक्षक. एक शिकवणं सोडलं तर इतर कामातच व्यग्र असणार्या भारताच्या भावी आधारस्तंभांचा आत्ताचा स्वतःच सैरभैर झालेला आधारस्तंभ म्हणजे शिक्षक. गेल्या दहा बारा वर्षांपासून तो शिक्षकच न रहावा इतपत त्याच्या भूमिकेत झालेला; किंबहूना सक्तीने घडवून आणलेला बदल स्वागताहार्य तरी आहे काय ?
'प्राउड टू बी अ टिचर ' असं कुठल्याच अँगलने म्हणायला जीभ रेटत नाही. जीभेला हाड नसलं तरी इतका तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणारी ही शिक्षक नावाची जमात जगाच्या पाठीवर इतरत्र कुठे सापडणे तरी शक्य आहे काय ?
२१व्या शतकात शिक्षक म्हणजे माहिती खच्चून भरलेल्या ज्ञानाचा स्त्रोत राहीलेला नाही. मुलांना माहीती स्वतःहून शोधण्यासाठी प्रवृत्त करणारा, त्याच्यातल्या प्रेरणेचा उद्गाता म्हणून त्याला अनेक प्रशिक्षणांच्या माध्यमांतून अपडेट केलं जातयं. केवळ एवढचं काम एका शिक्षकाचं राहीलयं म्हणून त्याच्याजवळ प्रचंड वेळ आहे हा गैरसमज मुळात डोक्यातून काढून टाकावा लागेल. प्रत्येक मुल एका धाटणीचं नसल्यामुळे शिकण्यासाठी निर्माण करुन दिलेली परिस्थिती सगळ्यांना लागू होईलच असं काही नाही. प्रत्येक मुलाचं घरातलं वातावरण, त्याच्या मनातलं वातावरण आणि समाजातलं वातावरण या तीनही स्तरांचा विचार करत प्रत्येक मुलाबाबत अष्टावधानी असणं बदलत्या शैक्षणिक धोरणांमुळे त्याला क्रमप्राप्तच आहे. अशा परिस्थितीत अशैक्षणिक कामांच्या सरबत्तीमुळे
भंडावून गेलेल्या गुरुजीला मुळात मुलांना वेळच न देता आल्यामुळे वाढलेली चिडचीड, वाढलेला त्रागा पर्यायाने मानसोपचार तज्ञ आणि कार्डीओलाॅजिस्टच्या खेट्या घालायला लावत आहे. अशा डिस्प्रेस्ड झालेल्या शिक्षकाच्या दिवसाची सुरुवातच मुळात डोळे विस्फारुन असंख्य लिंक उघडून बघत होते. आजच, आत्ताच, ताबडतोब, तात्काळ, महत्वाचे, अती महत्त्वाचे या शब्दांनी काळजात धडकी भरलेला गुरुजी प्रचंड तणावाखाली वावरतो. एकीकडे शाळेचा पट टिकवण्यासाठी 'मुल देतं का कोणी मुल' म्हणत विटभट्ट्या, शेतगड्याकडे बांध तुडवत फिरायचं आणि दुसरीकडे मोठ्या मुश्किलीने मिळालेल्या मुलांना ज्ञानदाना पासून वंचित ठेवायचं आणि सगळं कळत असूनही नाईलाजाने मोबाईलवर कुठलाही ठोस आऊटपूट नसलेली माहितीच भरत बसायचं याला काय अर्थ आहे ? वरुन अविचारीपणाने असे शिक्षणाला फाटा देणारे आज्ञापत्र धाडून यंत्रणेला काय हाशील करायचयं देव जाणे ? शिक्षकाच्या सहवासाविना अशी शैक्षणिक विकलांग पिढी जर निपजणार असेल तर लवकरच 'देश विकणे आहे'च्या मोठमोठ्या होर्डींग्ज लावून जाहीरनामा द्यावा लागेल ? 'सावधान ! अब दिल्ली दूर नहीं । 'केवळ प्रचार, प्रसिद्धीसाठी हे सगळं होणार असेल तर शेखचिल्ली सारखं ज्या फांदीवर बसायचं त्याच शाखा कोलमडून टाकण्याचा उपद्व्याप सुरु आहे अशी शंभर टक्के खात्री पटत आहे.
मुलांच्या शिकण्याच्या दिवसातला गोल्डन पिरीयड असा वायाला घालण्याचं पातक करायला लावणारं सरकारी धोरण भविष्याची राख लावणारं आहे. अशा कुजक्या पिलरवर भविष्य उभं करु पहाणारा, दररोजचे नवे फतवे धाडणारा शासननिर्णय चुलखंडात का घालू नये ? असे मस्तक पोखरुन काढणारे जळजळीत सवाल शाळेतले केविलवाणे चेहरे पाहून मनात थैमान घालताहेत.
एखाद्या प्रवासी सुरक्षितपणे वाहून नेणार्या एस.टी चालकाला वाहन चालवतांना अनेक काम करावी लागणं म्हणजे अपघात निश्चित आहे एवढं साधं लाॅजिक कळत नाही की त्याकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष केलं जातयं ?
शिक्षकाला एवढा त्रागा करायला लावणं काय कमी होतं तिथे तीन संरचित आहाराचा कार्यक्रम आखून मोकळे. कुपोषण विरहित महाराष्ट्राचा मानस अयोग्य नाहीच पण त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नको काय ? बौद्धिक भुकेला वेळेवर बौद्धीक खुराक नसेल तर शिक्षणाची मोडशी होवून ढासळणार्या सामाजिक आरोग्याबद्दल काहीही घेणंदेणं नसल्याचं पाहून प्रचंड वाईट वाटतं.
अशी बिनभरवशाची यंत्रणा लेकराला तिष्ठत ठेवत वृद्धांना साक्षर करणे, त्यांच्या परीक्षा घेणे, मार्कांचं आँनलाईन करणे म्हणजे उगवतीला झाकून ठेवत मावळतीला कोंबडं आरवलचं पाहीजे असा अट्टाहास करणेच नाही काय ? बदलापूरच्या साडेतीन वर्षांच्या चिमुरड्यांचा क्रुर अंत काळीमा फासणारा आहे. मोबाईल स्क्रिनला टच करत माहीती अपलोड करत राहिल्यास गुड आणि बॅड टच त्या चिमुल्यांना कधी शिकवणार ? महाराष्ट्राचं शील सांभाळायची पूर्वीची शिक्षकांची जबाबदारीही आता कैक पटीने वाढली आहे अशा वेळी लेकरं सोडून शिक्षकांना इतर कामात गुंतविणार्या व्यवस्थेविरोधात मन पेटून उठतयं, लोकमान्य टिळकांचा भर कोर्टातला जळजळीत सवाल नाईलाजाने प्रत्येकाच्या तोंडावर येतोय, शिक्षकांची मुल शिकवण्याची, घडवण्याची मूळ भूमीका अबाधित राहीलीच पाहीजे.