अहिल्यानगरचे पाथर्डी तालुका रहिवासी श्री.राहुल कर्डिले आता नांदेडचे जिल्हाधिकारी
अहिल्यानगरचे पाथर्डी तालुका रहिवासी श्री.राहुल कर्डिले आता नांदेडचे जिल्हाधिकारी
----------------------------------------
अहिल्यानगर : " अहिल्यानगरचे सुपुत्र आणि प्रशासनात " मिस्टर क्लीन " म्हणून परिचित असलेले श्री.राहुल कर्डीले यांची नुकतीच नांदेडच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. कर्डिले हे पाथर्डी तालुक्यातील रहिवासी असून विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. ते २०१५ च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी असून त्यांनी आतापर्यंत परभणी, अमरावती, चंद्रपूर, वर्धा या ठिकाणी काम केले. आता त्यांची नांदेडच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वर्धा जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण ठरली.अत्यंत साधी राहणी आणि मनमिळावू असा राहुल कर्डिले यांचा स्वभाव आहे. मित्रांमध्ये ते ज्या पद्धतीने वागतात त्याच पद्धतीने काम घेऊन आलेल्या सर्वसामान्यांशी वागतात. त्यामुळेच त्यांच्या कामाबद्दल कोणताही वाद निर्माण झाला नाही. तसेच ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणच्या नागरिकांमध्ये एक प्रकारचे समाधान दिसून येते.
राहुल कर्डिले यांची वर्धा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी प्रत्येक तालुक्याच्या तहसिलदार कार्यालयामध्ये ई-ऑफीस प्रणाली सुरू केली. त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जलद, पारदर्शक आणि ठराविक कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. ई ऑफिस प्रणाली सुरू करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला.
राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना घरोघरी सेवा देण्यासाठी सेवादूत हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला. त्या माध्यमातून नागरिकांना ९० महसूल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. आरटीएस पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने या सेवा पुरवण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील ९६ दुष्काळी गावांमध्ये नाल्यांचे खोलीकरण तसेच काठावर बांबू लागवड करण्यात आले.
नांदेडच्या जिल्हाधिकारी पदावर श्री.कर्डीले यांच्या नियुक्तीमुळे लोकांना केंद्रस्थानी ठेऊन काम करणारा एक प्रामाणिक अधिकारी नांदेडला मिळाला आहे.
परिस्थिती कोणतीही असो, अत्यंत शांत आणि संयमाने त्याला सामोरं जाणं ही राहुल कर्डिले यांची खासियत. प्रशासनात काम करतानाही त्यांनी हे तत्व सोडलं नाही. त्यामुळेच ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी कोणताही गाजावाजा न करता काम करून आपले नावलौकिक आणि कामाचा ठसा उमटवत आहेत.